सिंधुदुर्ग प्रतिनिधी ; संजय भोसले

सिंधुदुर्गात होणाऱ्या पीओपीच्या गणेश मूर्तींची विटंबना आणि पर्यावरण हानी विचारात घेऊन जिल्ह्यातील सर्व पर्यावरण स्नेही गणेशमूर्तीकारांनी पीओपीच्या गणेश मूर्ती न बनवता मातीच्या, शाडूच्या, लगदा मातीच्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग पर्यावरण पूरक गणेश मूर्तिकरांच्या भव्य मेळाव्यात घेतला. यावेळी पीओपीच्या मुर्त्यांवर बंधन आणण्याचा निर्णयही सर्वानुमते घेतला गेला. नुकत्याच झालेल्या कसाल येतील सिंधुदुर्ग जिल्हा मूर्तिकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या सिंधुदुर्गातील पर्यावरण पूरक गणेश मूर्तिकारांच्या मेळाव्यात पीओपीच्या परप्रांपासून आवक होणाऱ्या मुर्त्यांचा वापर जिल्ह्यात अधिकांश वाढतच चाललेला असून त्यामुळे मातीच्या मूर्तीकामावर अवकळा येत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. यामुळे पर्यावरणाला बाधा तर आहेच शिवाय गणेश मूर्तींची त्या विरघळल्या न गेल्याने जी दृश्य विटंबना होत असते याचाही गांभीर्याने विचार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात माती काम करणारे कित्येक गणेश मूर्तिकार यांच्या कलेला आणि हस्तकौशल्याला आज पीओपीच्या बाहेरून येणाऱ्या मुर्त्यांमुळे वाव राहिलेला नाही या गांभीर्यावरही प्रकाश टाकण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष बापू सावंत यांनी जिल्ह्यातील मातीकाम करणाऱ्यांच्या समस्यांचा आढावा घेतला. मूर्तिकारांना व्यवसाय वाढवण्यासाठी आणि व्यवसायासाठी लागणारे आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी संस्थेचे सदस्य होणे किती गरजेचे आहे हे बापू सावंत यांनी प्रतिपादन केले. संघटनेमार्फत संघटनेच्या सदस्यांना मिळण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. संघटनेमार्फत पीओपी मुर्त्यांच्या वापराच्या बंदीसाठी संघामार्फत पर्यावरण स्नेही मूर्तिकारांच्या स्वाक्षऱ्यांचे शासनाला निवेदन दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी मूर्तिकार उदय दुदवडकर यांनी जिल्ह्यातील गणेश मुर्तीकारांनी परप्रांतातून तयार पीओपीच्या मुर्त्या खरेदी करून, केवळ त्यावर रंग काम करून त्या विकून परप्रांतीयांचा धंद्याच्या वाढीला साथ न करता तसेच आपल्या हस्त कौशल्यातील कलेला न संपविता स्वतः पूर्वीप्रमाणे पर्यावरणाला पूरक असणाऱ्या मातीच्या मुर्त्या घडवून आपल्या कलेचा उद्धार करावा व स्वतःचा धंदा वाढवण्याचा प्रयत्न करावा. यासाठी जिल्ह्यातील कलाकारांनी संघटित होऊन आवश्यक साथ एकमेकांना द्यावी. मूर्तिकार जोशी यांनीही शाडूची माती आणि लगदा माती यांचा उपयोग करून गणेश मूर्ती बनविण्याचे आवाहन केले. गणेश मूर्ती करण्याचा व्यवसाय हा आर्थिक जोखिमेचा आणि कष्टाचा जरी असला तरी जिल्ह्यात पीओपी च्या मूर्तींची बाहेरील आवक थांबवता आली तर जिल्ह्यातील मूर्तिकारांना या व्यवसायात गणेश पूजकांचा भरघोस पाठिंबा मिळणारा आहे. मूर्तिकारांनी मूर्ती घडवण्याच्या आणि रंगविण्याच्या कामात आपली कला, आपले कौशल्य ओतावे आणि ग्राहकांची माने जिंकावीत. यासाठीचे मार्गदर्शन त्यांनी मेळाव्यात केले. इतरही काही वक्त्यांनी केलेल्या वक्तव्यातून शासनाकडून व बँकांकडून मूर्ती कामासाठी मिळणाऱ्या आर्थिक सुविधांच्या बाबतीत दिरंगाई व कोंडी होत असते असे सांगण्यात आले. यावर आवश्यक तेव्हा संघटना शासनाकडे व बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडे समन्वय संपर्क साधून मार्ग काढेल असे आश्वासन अध्यक्ष बापू सावंत यांनी दिले. यावेळी गावस्तरावर ग्रामपंचायतींना निवेदने देऊन ग्रामपंचायतीकडून गावात पीओपी ची मूर्ती आणण्यावर व तिचे विसर्जन करण्यावर बंदी आणण्याबाबत निर्णय करण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासकीय पातळीवर करण्यात यावी यासाठी ठोस पाऊल जिल्हा मूर्तीकार संघटनेमार्फत उचलण्यात येणार आहे. रणजीत मराठे, विलास मळगावकर, अंकुश मेस्त्री, नारायण कुंभार, शंकर राणे, अमोल राणे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मनोहर सरमळकर यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले.
